2025 च्या रब्बीपासून पाणी मिळणार
अमरावती, दि. 22 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मोर्शी तालुक्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे बांधकाम पूर्ण झाले असून, सन 2025 च्या रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांमार्फत (पा.वा.सं.) करावयाचे असल्याने, त्यांना सक्षम करण्यासाठी नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अधीक्षक अभियंता मनीष राजभोज, सेवानिवृत्त प्राध्यापक बाळासाहेब शेटे, सेवानिवृत्त जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता किशोर वरंभे उपस्थित होते. कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी प्रास्ताविक केले.
श्री. राजभोज यांनी 'महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन 2005' या कायद्यानुसार स्थापन झालेल्या 6 पाणी वापर संस्थांना पाण्याचा इष्टतम वापर, पीक पद्धती निवडणे, घनमापन पद्धतीने पाणी वापर करणे आणि पाणीपट्टी वसुलीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करून गावाचा विकास करण्याचे आवाहन केले. श्री. शेटे आणि श्री. वरंभे यांनी सिंचन कायदे, पा.वा.सं. चा उद्देश, कार्यप्रणाली आणि गट शेती या विषयांवर मार्गदर्शन केले. संत सेवालाल महाराज (जळका), संत पांडुरंग महा. (जळका), एकनाथ महा. (आमला), विश्वेश्वर पा.क.रते. (आमला), परिवर्तन (टेंभुर्णी), आणि समृद्धी (टेंभूर्णी) या सहा संस्थांचे अध्यक्ष, सदस्य प्रशिक्षणात सहभागी झाले होते. त्यांना हस्तांतरण प्रमाणपत्र व उपस्थिती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
Post a Comment
0 Comments