अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच अमली पदार्थाचे वितरण होत असलेल्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यात यावे. प्रामुख्याने परराज्यातून येणाऱ्या गांजा आणि इतर पदार्थांविरोधात व्यापक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
नार्को को-ऑर्डिनेशन सेंटरची जिल्हास्तरीय समितीची मासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात यावे. यात प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी लक्षगट ठेवण्यात यावे. अमली पदार्थाविरोधात व्याख्यान देणाऱ्या वक्त्यांना शाळा-महाविद्यालयांशी संपर्क साधून त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. शहरातील मोठ्या शाळांमध्ये आठवड्यातून एकदा व्याख्यान होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विद्यार्थ्यांना अमली पदार्थाविरोधात माहिती देण्यात यावी. त्यासोबतच शासनाच्या पत्रव्यवहारावर ‘नशामुक्त भारत, खुशहाल भारत’ ही टॅगलाईन उपयोगात आणावी.
गांजा आणि इतर अमली पदार्थ इतर राज्यातून येत असल्याची माहिती आहे, त्यामुळे यावर लक्ष ठेऊन व्यापक प्रमाणात कारवाई करण्यात यावी. तसेच शासकीय रूग्णालयात ड्रग्स सेवन केलेले रूग्ण आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी. अमली पदार्थ विरोधात जनजागृती ही महत्वाची आहे. युवक केंद्रीत करून प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापर्यंत पोहोचावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Post a Comment
0 Comments