प्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित
अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) - ग्रामीण भागातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने शासनामार्फत 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात येत आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण पाच गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती यांच्यामार्फत यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अचलपूर (कांडली), अंजनगाव सुर्जी (कापूसतळणी, सातेगाव), चांदुर रेल्वे (आमला विश्वेश्वर), आणि दर्यापूर (येवदा) या गावांमध्ये किंवा संबंधित तालुक्यांमधील इतर गावांमध्ये प्रशिक्षण राबविण्यासाठी संस्था अर्ज करू शकतात. इच्छुक संस्थांनी आपला परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 17 ऑक्टोबर, 2025 पूर्वी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे .
अर्जदार संस्था भागीदारी फर्म, एलएलपी, खाजगी,पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा सोसायटी, पब्लिक ट्रस्ट कायद्यानुसार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच, मागील चारपैकी (2020-21 ते 2023-24) कोणत्याही दोन वर्षांत संस्थेची सरासरी वार्षिक उलाढाल प्रति ठिकाण 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असावी. तसेच, अर्जदार कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेद्वारे काळ्या यादीत (Blacklisted) नसावा. संस्थांच्या निवडीचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत. अधिक माहिती किंवा अडचणीसाठी कार्यालयाच्या (0721-2566066) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवकांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे. अर्जदार हा ट्रेनर पार्टनर म्हणून स्कील इंडिया डिजिटल पोर्टल पर सूचीबद्ध झालेला असावा.
अर्जदाराने अल्पकालीन प्रशिक्षण मध्ये किमान 300 उमेदवारांना प्रशिक्षित केलेले असावे. अर्जदाराने उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार दिलेला असावा. सर्व माहिती तसेच आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास संपर्क साधावा. अर्जदारास कौशल्यासाठी कोणताही पुरस्कार मिळाला असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
Post a Comment
0 Comments