अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात सिंधी समाजाला दिलेल्या जमिनींच्या मालकी हक्कासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अभय योजना २०२५ लागू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सर्वप्रथम केल्याबद्दल सिंधी पंचायतांच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांचा सत्कार केला.
या योजनेंतर्गत सिंधी समाजास वाटप झालेल्या जमिनींचे मुक्तधारण रूपांतर करता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यशस्वीरित्या करण्यात आली, ही बाब संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरली आहे.
यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष आत्माराम पुरसवानी, उपाध्यक्ष हेमंनदास आसवानी, सदस्य दीपक दादलानी, अमर गेही, राजेश तरडेजा, नरेश धमाई, शैलेन्द्र मेघवानी, सुरेश हेमनानी, नंदलाल धमाई, अजय मेघवानी, टेकचंद केशवानी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, राज्य शासनाने ही एक अत्यंत उपयुक्त आणि दूरगामी परिणाम करणारी योजना सुरु केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या योजनेच्या अंमलबजावणीचा भाग बनू शकल्याबद्दल अभिमान वाटतो. या योजनेचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. समन्वय समितीने सिंधी समाजामध्ये या योजनेची माहिती पोहोचवण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
आत्माराम पुरसवानी आणि टेकचंद केशवानी यांनी, फ्री होल्ड रूपांतरणाचा प्रश्न प्रलंबित होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने जलद गतीने कार्यवाही केल्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंधी समाजातर्फे प्रेम आणि कृतज्ञतेच्या प्रतिक म्हणून जिल्हाधिकारी यांना मिठाई अर्पण करण्यात आली. दीपक दादलानी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
Post a Comment
0 Comments