Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कल्याण समितीच्या दौऱ्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर


अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्ह्यातील तीन दिवसांचा दौरा निश्चित झाला आहे. प्रशासकीय स्तरावर कोणतीही उणीव राहू नये, तसेच समितीमधील सदस्यांच्या संभाव्य माहितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दि. १९ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान असलेल्या दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, तहसिलदार निलेश खटके, विजय लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आदी उपस्थित होते.

समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सूचना केल्या. यात मागासवर्गीय कक्ष कार्यरत आणि याठिकाणी माहिती अद्यावत असल्याची खात्री करावी. समितीचे सदस्य हे विस्तृत आढावा घेत असल्याने त्यांचे समाधान होईल, अशी माहिती तयार करण्यात यावी. प्रामुख्याने दौऱ्यामध्ये आश्रमशाळा आणि वसतिगृहांना भेटी देण्यात येत असल्यामुळे याठिकाणच्या समस्या जाणून त्या पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. यासोबतच ॲक्ट्रॉसिटी अंतर्गत प्रकरणे असल्यास त्याची सद्यस्थिती तयार ठेवावी. तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे जात प्रमाणपत्र प्रलंबित असल्यास त्याचा पाठपुरावा करून प्राप्त करून घ्यावे.

पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून कार्यवाही झाली असल्याची खातरजमा करावी. पोलिस, महावितरण मधील अधिसंख्य पदावरील माहिती तयार ठेवावी. एसटी महामंडळ, विद्यापीठ, शिक्षकांची भरती झाली असल्यास जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.


--

Post a Comment

0 Comments