खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त बसस्थानकासमोरील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाचे दि. ६ augest ला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, माविमचे वरीष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे, खादी ग्रामोद्योगचे जिल्हा व्यवस्थापक प्रदिप चेचेरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी फित कापून खादी महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कस्तुरबा सोलर खादी महिला समिती अंतर्गत मेळघाट क्षेत्रातील धारणी तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या महिलांनी कापसापासून सूत आणि सुतापासून कापड ते गारमेंट उत्पादनांची पाहणी केली. या क्लस्टरतर्फे महिलांनी उत्पादीत केलेला माल खादी महोत्सवात विक्री करण्यात येत आहे, या महिलांशी संवाद साधून जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच बचतगट उत्पादीत मालांची पॅकेजिंग आणि ब्रँडिगवर लक्ष देण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी खादीचा दैनंदिन जीवनातील वापर वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या काळात खादीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महोत्सवात विकेंद्रित सोलर चरखा समूहाच्या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी महिलांनी तयार केलेली दर्जेदार खादी आणि सौर खादी उत्पादने उपलब्ध आहेत. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी तयार केलेली विविध उत्पादने सवलतीच्या दरात नागरिकांना मिळणार आहेत. खादी महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने केले आहे.
Post a Comment
0 Comments