भारताच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत महिलांचे योगदान अमूल्य आहे. मात्र, एकेकाळी स्त्री जन्माचे स्वागत करण्यास कचरणाऱ्या समाजात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या महत्त्वाकांक्षी मोहिमेने केवळ शासकीय आकडेवारीच नव्हे, तर सामान्यांच्या मानसिकतेतही क्रांती घडवून आणली आहे. आज ही मोहीम केवळ घोषणा न राहता 'समर्थ भारता'चा पाया ठरत आहे.
दशकांपूर्वी घसरलेला स्त्री-जन्मदर ही देशासमोरील मोठी चिंता होती. परंतु, गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT )कायद्याची कडक अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीमुळे आज चित्र बदलले आहे. ग्रामीण भागातही आता मुलीच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा केला जात आहे, ही या मोहिमेची पहिली मोठी यशप्राप्ती आहे.
केवळ मुलगी वाचवणे पुरेसे नाही, तर तिला स्वावलंबी करणे हे या योजनेचे दुसरे महत्त्वाचे पाऊल आहे. शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती आणि सायकल वाटप यांसारख्या उपक्रमांमुळे माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
'सुकन्या समृद्धी योजने'द्वारे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पालकांची होणारी आर्थिक ओढाताण थांबली असून, भविष्यातील गुंतवणुकीचा एक सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे.
मुलींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकारने 'महिला हेल्पलाईन १८१' आणि 'वन स्टॉप सेंटर' सारख्या यंत्रणा उभारल्या आहेत. तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रात मुलींनी मारलेली भरारी ही या सक्षमीकरणाची उदाहरणे आहेत.
जेव्हा आपण एका मुलीला शिक्षित करतो, तेव्हा आपण संपूर्ण पिढीला सुसंस्कृत करत असतो. 'लेक वाचवा, लेक शिकवा' ही मोहीम भारताला 'विश्वगुरू' बनवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी देखील 'बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ' या मोहिमेला विशेष पाठबळ दिले होते.
आजची 'लेक' ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहे. घराघरांतून सुरू झालेला हा स्त्री-शक्तीचा जागर जेव्हा पूर्णत्वास येईल, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने आर्थिक महासत्ता म्हणून जगात नावाजला जाईल. गरज आहे ती फक्त आपली सामाजिक जबाबदारी ओळखून, प्रत्येक मुलीला प्रगतीची समान संधी देण्याची !
Post a Comment
0 Comments