शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा (चना) खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील मंजूर केंद्रांवर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी हरभरा पिकासाठी केंद्र शासनाने ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत दर निश्चित केला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी संबंधित खरेदी केंद्रावर खालील कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य आहे. चालू हंगामातील हरभरा पिकांची नोंद असलेला डिजिटल ७/१२ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किवा कॅन्सल चेक (ज्यामध्ये IFSC कोड स्पष्ट दिसेल), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक.
शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी तो स्वच्छ, वाळलेला आणि एफएक्यू दर्जाचा असावा याची खात्री करावी. ऑनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल, त्यानंतरच माल केंद्रावर आणावा. कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत खरेदी केंद्रावरच आपली नोंदणी करावी.
अमरावती विभागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हरभरा खरेदी केंद्रांवर जाऊन आपली नोंदणी करावी आणि हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments