Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 



*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी

*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या सुधारणेसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीम (एसआरआर) हाती घेण्यात येणार आहे. राज्यात साधारणत: एप्रिल महिन्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सध्या सुरू असलेल्या मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १८ ला मतदारयाद्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमेबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमेबाबत माहिती दिली. निवडणूक आयोगाकडून सध्याच्या मतदारयाद्या ह्या 2002 च्या मतदारयाद्यांशी जुळविण्यात येत आहे. या मॅपिंगच्या कामात जास्तीत जास्त मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग करावे लागणार आहे. मॅपिंगमधून उर्वरीत मतदारांची पाच दिवसांत सुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात मॅपिंग होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत 46 टक्के मतदारांचे मॅपिंग झाले आहे. येत्या दहा दिवसात हे प्रमाण 80 टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत.

मॅपिंगचे काम सुकर करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ज्या मतदारांचे मॅपिंग करावयाचे आहे, ती यादी आणि 2002ची मतदारयादी तयार ठेवावी. त्यानंतर येत्या दहा दिवसात प्रत्येक घरी जाऊन मतदारांची जुळवणी करावी. ही सर्व कामे संगणीकृत आहेत, तसेच यासाठी दोन ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून कुशल मनुष्यबळ पुरविण्यात यावे. मॅपिंगच्या कामाचे प्रमाण वाढल्यास विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमेतील ताण कमी होणार आहे. त्यामुळे मॅपिंगची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.


Post a Comment

0 Comments