अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती शहर तहसीलदार (संजय गांधी योजना) यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card) आधार कार्डशी संलग्न (E-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. प्रियांका मिसाळ यांनी केले आहे.
शासन निर्देशानुसार, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या युडीआयडी कार्डशी लिंक नसेल, अशा लाभार्थ्यांचे एप्रिल 2026 पासून मिळणारे 2 हजार 500 रुपये मासिक अनुदान तांत्रिक कारणास्तव थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र संजय गांधी योजना कार्यालय, अमरावती शहर येथे 31 मार्चपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थी ही ई-केवायसी प्रक्रिया स्वतः www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावरून किंवा UDID App द्वारे करू शकतात. याशिवाय जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा संजय गांधी योजना शहर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहूनही ही नोंदणी करता येईल. कार्यालयात येताना लाभार्थ्यांनी आपला मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप युडीआयडी कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी शासकीय रुग्णालयातून ते तात्काळ प्राप्त करून घ्यावे, कारण भविष्यात लाभ सुरू ठेवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य राहणार आहे, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments