Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ऊर्जा संवर्धनावर विभागीयस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा;

 दिनांक: ७ फेब्रुवारी 2026


·        उर्जा बचतीचे महत्व पटवून देण्यासाठी अभिनव उपक्रम

·        २० फेब्रुवारी रोजी स्पर्धा होणार

          अमरावती, दि. ७ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचत व अपारंपरिक ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य शासन व महाऊर्जा विभागाच्या वतीने विभागीयस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाऊर्जा‍ विभागातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद/नगरपालिका च्या शाळा, समाजकल्याण शाळा व आदिवासी विकास विभागाच्या शाळा आदींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाऊर्जा विभागाव्दारे करण्यात आले आहे.  विभागाच्या निर्देशानुसार ही स्पर्धा दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे होणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

            ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने यापूर्वीही विविध उपक्रम राबविले असून, विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचतीचे महत्त्व रुजवून ते संदेश पालक व समाजापर्यंत पोहोचविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद/नगरपालिका शाळा, समाजकल्याण व आदिवासी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

            प्रत्येक शाळेतून एक किंवा दोन गटांची नोंदणी करता येणार असून, प्रत्येक गटात एक किंवा दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नोंदणी केलेल्या गटांनाच स्पर्धेत सहभाग दिला जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त २०० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी स्वीकारली जाणार आहे.

            सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाऊर्जा विभागीय कार्यालय, अमरावती मार्फत प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

            स्पर्धेसाठी अकोला व बुलढाणा जिल्ह्यांसाठी समन्वय अधिकारी म्हणून शैलेश मुळे, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यांसाठी विजय काळे तर अमरावती जिल्ह्यासाठी हर्षल काकडे हे समन्वय अधिकारी म्हणून कार्य पाहणार आहेत. संबंधित शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा लाभ द्यावा, असे आवाहन महाऊर्जा विभागाकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments