आता तालुकानिहाय होणार किटचे वाटप
अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संचाचे वाटप 13 फेब्रुवारी 2026 पासून तात्पुरते बंद करण्यात आले आहे. वाटपाच्या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आता हे वाटप तालुकानिहाय केले जाणार असल्याची माहिती कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
मंडळामार्फत साहित्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ दिली जाते. ज्या कामगारांनी 13 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत गृहपयोगी वस्तू संच मिळण्यासाठी नोंदणी केली होती, अशा ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारांची गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. यामुळे साहित्यासाठी नोंदणी केलेल्या कामगारांना वेळेत संच देणे शक्य होत नाही. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सध्याचे वाटप तात्काळ बंद करून प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जास्तीत-जास्त 500 संच वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुकानिहाय वाटपाच्या तारखा संबंधित कंत्राटदाराकडून कामगारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहेत. तोपर्यंत कामगारांनी वाटप केंद्रावर गर्दी करू नये आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त, अमरावती विभाग यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments