अमरावती, दि. ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महसूल गुप्तचर संचालनालयाने पाच किलो एमडी ड्रग्स पकडून कार्यवाही केली आहे. शहराच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रामुख्याने युवकांमध्ये जनजागृती करावी, तसेच स्थानिक पोलिस यंत्रणांनी संपर्क वाढवून एमडी ड्रग्सबाबत कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर जिल्हास्तरीय समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखेडे यांनी अंमली पदार्थाबाबत माहिती दिली. अंमली पदार्थाबाबत प्रामुख्याने किशोरवयीन मुले लक्ष्य होत असल्याने त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी व्याख्याने आयोजित करण्यात यावे. येत्या 15 दिवसात समाज कल्याणमधील सर्व वसतिगृहे आणि शाळांमध्ये ही व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. आऊटरिच कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करण्यात यावी. यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. 'नशामुक्त भारत, खुशहाल भारत' या टॅगलाईनला अनुसरून व्यापक जनजागृती करावी.
अंमली पदार्थामुळे समाजावर दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी संपर्क वाढवून सातत्याने कारवाई करावी. अमरावती येथील कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांनी बंद घरे, फ्लॅट यांच्यावर निगराणी ठेऊन गोपनीय पोलिस यंत्रणा सतर्क करावी. आवश्यकता पडल्यास अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करावी. तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रामख्याने औद्योगिक परिसरातील बंद कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचे काही ठिकाणी लक्षात आल्याने अशा परिसरावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.
Post a Comment
0 Comments