एरवी निबंध म्हटलं की अनेक विद्यार्थी रडत-खडत लिहितात, पण येथील एका ८ वीच्या विद्यार्थ्याला 'चोर' या विषयावर निबंध लिहायला सांगितला असता, त्याने लिहिलेला निबंध वाचून शिक्षक आणि नागरिक आश्चर्यचकीत झाले आहेत. या विद्यार्थ्याने चोरांचे महत्त्व पटवून देताना अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान विनोदी शैलीत मांडले आहे. शिक्षकांनी या निबंधाला १००% गुण देऊन त्याला मेरिट लिस्टमध्ये स्थान दिले.
"चोर हे देखील देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते रोजगारनिर्मिती आणि देशाच्या विकासात मोठे योगदान देतात," असे विद्यार्थ्याने नमूद केले. सेफ, कुलुपे, लॉकर, कपाटे इत्यादी वस्तू फक्त चोरांमुळेच तयार केल्या जातात, ज्यामुळे या वस्तू बनवणाऱ्या अनेक कारखान्यांना आणि कामगारांना रोजगार मिळतो.
घरांमध्ये कुलपे, ग्रील्स, दरवाजे आणि खिडक्यांवर लॅच बसवण्यासाठी मिस्त्री आणि कामगारांना काम मिळते. तसेच, घर, दुकान, शाळा, कॉलेज, ऑफिस आणि कारखाने चोरांपासून वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन आवश्यक असतात, ज्यामुळे या क्षेत्राला रोजगार मिळतो.
CCTV कॅमेरे, मेटल डिटेक्टर, सुरक्षा यंत्रणा बनवणाऱ्या कंपन्यांना रोजगार मिळतो. तसेच, चोरांमुळे पोलीस अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश, वकील यांनाही काम मिळते. पोलीस दलासाठी लागणारी बॅरिकेड्स, शस्त्रे, गोळ्या, दंडुके, गणवेश, वाहने इत्यादी खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
मोबाईल, लॅपटॉप, कार, मोटरसायकल, घरगुती वस्तू, पर्स किंवा लिपस्टिक चोरी गेल्यानंतर लोकांना त्या पुन्हा खरेदी कराव्या लागतात, ज्यामुळे व्यापार वाढतो.
निबंधाचा शेवट करताना विद्यार्थ्याने "प्रसिद्ध तसेच नामांकित चोर राजकारणात प्रवेश करून आणखी मोठ्या चोरीला हात घालतात," असा शेरा मारला आहे.
एकूणच, या निबंधातून विद्यार्थ्याचा दृष्टिकोन आणि निरीक्षणशक्ती दिसून आली असून, शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.
Post a Comment
0 Comments