Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

'एक दिवस सैनिकांसाठी'अभियान राबविणार -जिल्हाधिकारी आशिष येरेकर







सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

            अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतमातेच्या संरक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत देश सेवा करणारे सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे पाल्य यांना जिल्हा प्रशासनाची मदत व्हावी, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, 'एक दिवस सैनिकांसाठी' हे अभियान राबविण्यात येईल. जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित विभाग त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सहकार्य करतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी काल येथे दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्र सेना ध्वज दिन-2025 निधी संकलन समारोहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

            राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गजरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश ठाकरे, जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर आदी यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, आपले सैनिक सीमेवर देश संरक्षणार्थ लढत असतात. रात्रंदिवस देशासाठी लढा देणाऱ्या सैनिकांप्रती आपल्याला अभिमान आहे. देशाची अखंडता, प्रगती, देशाचे अस्तित्व यांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचे आपण सर्व ऋणी आहोत. देशसेवा करताना ते आपल्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. महसूल, मोजणी, कृषी, पोलीस विभाग अशा विविध शासकीय कार्यालयांकडे त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. येथे सैनिक बांधवांचे  तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सैनिक बांधव तसेच त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारी जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर यांच्याकडे नोंदवाव्यात. एक दिवस सैनिकांसाठी या अभियानांतर्गत या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

   भारत देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेव्हा इतरही जवळपासचे देश स्वतंत्र झाले. परंतु इतर देशांपेक्षा आपला देश ‘विकसित देश’ म्हणून आज नावारूपाला आलेला आहे. हे केवळ भारतीय सैनिकांचे दृढ मनोबल व इच्छाशक्तीमुळे शक्य झाले आहे. भारतीय सेना बल देशाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते, हा भारतीयांचा दृढ विश्वास आहे. सैनिक बांधव सीमेवर लढत आहे, त्यामुळेच आपण स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहोत. आजवरच्या इतिहासात भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा आपण ऐकत आले आहोत. त्यांच्या शौर्यगाथेतून आपल्याला आणि येणाऱ्या पिढीला निरंतर प्रेरणा मिळत राहील. सैनिक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  सशस्त्र सेना ध्वजदिन राबविण्यात येतो. यातून सैनिकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्यासाठी हा निधी खर्च करण्यात येतो. मागील वर्षी अमरावती जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त ध्वजनिधी संकलित केला. यावर्षी देखील दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक ध्वजनिधी जमा करण्यासाठी आपण सर्व एकत्रितरित्या प्रयत्न करूया. यावर्षी  कोटी रुपये ध्वजनिधी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवूया, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

            श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत ध्वजदिन निधी संकलनासाठी 25 लक्ष रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीर पत्नी श्रीमती वनमाला, श्रीमती कांताबाई, श्रीमती नूतन, श्रीमती सरस्वती, श्रीमती सुनिता, श्रीमती मनुताई, श्रीमती रेणुका तसेच वीर माता श्रीमती रंभाई, श्रीमती बेबीताई ऊईके तसेच श्रीमती पथोड यांना सन्मानित करण्यात आले.

            विशेष गौरव पुरस्काराने माजी सैनिक भावे किशोर उत्तम यांचा मुलगा स्वराज,  श्रीमती वर्षा रमेश खडसे यांची मुलगी सावी, संतोष खंडूजी श्रीनाथ यांचा मुलगा आदित्य, वनकर अनिल खंडुजी यांची मुलगी निहारिका, तायडे वासुदेव व्यंकटराव यांचा मुलगा पियुष, विनोद बाबूलाल वानखडे यांची मुलगी संस्कृती यांना विशेष पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, शौर्यपदकधारक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाथरकर यांनी केले. संचलन वैभव निमकर तर आभार सुरेखा पथोड यांनी मानले.


 

Post a Comment

0 Comments