अमरावती, दि.२७(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या पुस्तकांसाठी ही स्पर्धा असून, पात्र साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत सन 2025 च्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका आणि पुस्तके या विहित कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करणे आवश्यक आहे. 30 जानेवारीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज आणि पुस्तके खास दूतामार्फत किंवा टपालाने 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठविली जाणार आहेत. मराठी साहित्यातील विविध प्रकारांमधील उत्कृष्ट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
Post a Comment
0 Comments