‘वंदे मातरम्’ गीताच्या ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवास सुरुवात
अमरावती, दि. 7 : राष्ट्रभक्तीचे प्रतीक ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रभक्तीच्या वातावरणात ‘वंदे मातरम्’ गीताचे आज सामूहिक गायन करण्यात आले.
विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अपर आयुक्त सुरज वाघमारे, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, रविंद्र हजारे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘वंदे मातरम्’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी, 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान एकूण चार टप्प्यात राज्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात ‘वंदे मातरम्’ गीत ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवासाची आज सुरुवात झाली आहे. या महोत्सवासाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
Post a Comment
0 Comments