अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : खुटीया, एकताई, सिमोरी, हातरू येथील रस्ते, वीज, पुल आदींच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. प्रामुख्याने या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
मेळघाटातील नागरिकांनी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. त्यानुषंगाने मागण्यासंदर्भात गावातील नागरिकांशी ४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., किर्ती जमदाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, कुटीदा ते सिंभोरी आणि सोमिथा ते कुटीदा या रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल. या रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची शक्यता पडताळून पाहता येईल. मेळघाटातील हातरू ते करंजखेड मार्गाचा संपर्क तुटत असल्याने याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. पुलाच्या कामांना सुमारे 15 कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात येणार आहे. ही कामे व्हावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी जरिदा उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या काळात 22 गावातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. विजेच्या समस्येमुळे मोबाईलचे नेटवर्क राहत नाही. याबाबत विजेची सोय असणाऱ्या ठिकाणी नेटवर्क राहण्यासाठी सूचना देण्यात येतील. आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागाकडून करण्यात येते. ही खरेदी सुरू करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येतील. तसेच नागरिकांच्या रस्ते, वीज, पुलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी लागणार आहे. ही कामे होण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments