अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : ‘वंदे मातरम’ या गीतास आज दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभर वंदे मातरम गीत गायन, देशभक्तीपर भाषणे, निबंध, लेखन, वक्तृत्व स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 10 वाजता वंदे मातरम् गीत गायीले जाणार आहे. तसेच संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), अमरावती येथे सामुहिक वंदे मातरम् गीत गायीले जाणार आहे.
बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्यसाधारण महत्च प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारकांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे.
वंदे मातरम कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार आज, 7 नोव्हेंबर रोजी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त, अमरावती शहरात संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथील क्रीडांगणावर सकाळी 9.30 वाजता या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहसंचालक अनंत सोमकुवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यावेळी देशभक्तीपर गीत गायन, लेझिम पथनाट्य आणि व्याख्यान अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त 'सार्थशताब्दी महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील 358 तालुक्यांमध्ये हा 'गौरव दिन' साजरा होत आहे.
देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्यात तिन्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (संत गाडगेबाबा, भगिनी निवेदिता, दादासाहेब खापर्डे) प्रशिक्षणार्थी आणि निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी राम मुळे यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments