Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम


अमरावती, दि. 09 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : रेशिम संचालनालय 1 सप्टेंबर 1997 रोजी स्थापना करण्यात आली. त्यामुळे 1 सप्टेंबर रेशिम दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रेशीम संचालनालय संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘रेशिम विभाग आपल्या दारी’ योजना राबविण्यात येणार आहे.

 शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापूर्वी रेशिम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे 500 रूपये प्रती एकर प्रमाणे नोंदणी  केली होती. परंतू काही कारणाने तूती लागवड केली नाही. त्यांना त्यांचे घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक आणि पुन्हा रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड त्यावेळी केली नसल्याबाबत अभिप्राय घेण्यात येऊन अडचण दूर करण्याचा प्रयत्न रेशीम संचालनामार्फत करण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

 जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी केले जाणार आहे. एका गावातून कमीत कमी 5 शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवकामार्फत अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी प्रति एकर 500 रूपये नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा कराव लागणार आहे. मनरेगांतर्गत एक एकर वृक्ष जोपासना करण्यासाठी 2 लाख  रूपयांची मंजुरी तीन वर्षात दिली जाणार आहे. रेशीम किटक संगोपनगृह बांधकामासाठी 66 हजार 456 रूपये मजुरी, साहित्यासाठी 1 लाख 53 हजार रूपये जातील, यात 4 लाख 32 हजार रूपये तीन वर्षात दिले जाणार आहे.

 बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र - 2 योजनेत सहभाग घेता येईल. तुती वृक्ष लागवडीसाठी 1 एकरकरीता 45 हजार रूपये, सिंचन व्यवस्थेकरिता 45 हजार रूपये, संगोपनगृह बांधकामकरीता 2 लाख 43 हजार 750 रूपये, संगोपन साहित्याकरीता 37 हजार 500 रूपये आणि निर्जतुकिकरण औषधीसाठी 3 हजार 750 रूपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. या योजनेतून होणारी तूती लागवड मुख्यमंत्री यांनी या पावसाळ्यात 10 कोटी वृक्ष लागवड पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उदिष्ठ दिले आहे. त्यामध्ये तुती वृक्ष लागवडीची गणना होणार आहे. रेशिम संचालनालयास 4 कोटींचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यापैकी 24 लाख 400 एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले आहे.

 शेतकऱ्यांनी पर्यावरण पूरक व शेतीशी निगडीत रेशीम उद्योग करून रेशीम कोशनिर्मितीपासून उत्‌पन्न वाढवावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

                                                                 00000

Tags

Post a Comment

0 Comments