अमरावती, दि. 10 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्प गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी भूसंपादन झाल्याने स्थलांतरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे. बाधित गावांमधील कुटुंबांना भेट देऊन नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर करावे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
निम्नपेढी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पाचही गावांचा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज आढावा घेतला. नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर करावे, यासाठी त्यांना स्थलांतरणासाठी देण्यात येणारे एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. तसेच पुनर्वसित गावात पाणीपुरवठ्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. यामुळे नागरिकांचा कल पुनर्वसित गावात जाण्याकडे राहील.
सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक सुविधा पुनर्वसित गावात स्थलांतरित करण्यात यावे. प्रामुख्याने रेशन दुकान, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय स्थानांतरित केल्यास नागरिकांचे स्थलांतरण गतीने होण्यास मदत मिळेल. सध्यास्थितीत गावामध्ये राहत असलेल्या नागरिकांनी चर्चा करून त्यांना पुनर्वसित गावात घरकुल उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक पावले उचलण्यात यावीत, असा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.
00000
Post a Comment
0 Comments