अमरावती, दि. ३ : केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग योजनांच्या सर्व लाभार्थ्यांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासनाने एप्रिल २०२५ पासून योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण थेट त्यांच्या बँक खात्यात करण्यास सुरुवात केली आहे. तसेच दि. २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार, लाभार्थ्यांनी वर्षातून एकदा त्यांची हयात असल्याची तपासणी करणे अनिवार्य आहे. यासाठी, 'आधार आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली' अंतर्गत 'बेनीफिशरी सत्यापन ॲप' विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लाभार्थी कोणत्याही अँड्रॉइड मोबाईलवर त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र विनामूल्य काढू शकतात.
जिल्ह्यात दि. २ सप्टेंबरपर्यंत एकूण 62,691 पैकी 11,912 लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र काढले आहेत, तर अद्याप 50,779 लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र काढणे बाकी आहे. लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र हे पोर्टलवर अपडेटअभावी अनुदान मिळण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाइन हयातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, संजय गांधी योजना विभाग येथे देखील काढून देण्याची सुविधा केली आहे.
केंद्र पुरस्कृत सर्व लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे लाभार्थी पोर्टलवर ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच त्यासाठी निधीही मिळणार नसल्याने लाभार्थ्यांचे अनुदान थांबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तहसील कार्यालय किंवा अँड्रॉईड मोबाईलमध्ये ॲपद्वारे ह्यातीचे प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Post a Comment
0 Comments