अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी उमेदवारांसाठी कार्यरत असलेल्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध शासकीय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण येथे दिले जाणार असून, ही आदिवासी सुशिक्षित उमेदवारांसाठी संधी आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी १ ऑगस्ट २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत, म्हणजे साडेतीन महिन्यांचा असेल. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन म्हणून दिले जाईल. विशेष म्हणजे, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा पुढील अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार महत्त्वाच्या पुस्तकांचा संच विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या तयारीला मदत होईल.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी आपले अर्ज २९ जुलै २०२५ पर्यंत केंद्राच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी ३० जुलै २०२५ (बुधवार) रोजी दुपारी १२ वाजता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एसएससी (दहावी) उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील नोंदणी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासह सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. मुलाखतीनंतर निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवाराचे वय १८ ते ३० वयोगटातील असावे. किमान एसएससी उत्तीर्ण असावे. उमेदवाराची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात केलेली असावी. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments