अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान' अंतर्गत आदिवासी व आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. योजनांच्या माहितीसाठी महिती, शिक्षण आणि संवाद मोहिम राबविण्यात येत आहे. यानुसार सलोना, ता. चिखलदरा येथे जनजागृती आणि लाभ वितरण शिबीर आज पार पडले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानात ३० जून पर्यंत 'धरती आबा जनभागीदारी अभियान' विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत, आज सलोना, ता. चिखलदरा येथील अनुदानित आश्रमशाळेत जनजागृती शिबिर पार पडले. शिबीराचे उद्घाटन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात महसूल, कृषी, आदिवासी विकास, आरोग्य, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेच्या विभागांचे स्टॉल लावण्यात आले. तसेच विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. सलोना आणि परिसरातील नागरिक या शिबीराला उपस्थित होते.
लाभार्थ्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी आणि मतदान ओळखपत्र यांचे लाभ देण्यात आले. तसेच, लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी करण्यात आली. तसेच विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments