Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

बदलत्या हवामानातील शेतीसाठी 'पोकरा'बाबत १३ फेब्रुवारीला विशेष वेबिनार

 


अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, राज्याच्या आर्थिक विकासामध्ये कृषी उत्पन्नाचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, मागील दशकापासून हवामानात होणाऱ्या जलद बदलांमुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असून पिकांच्या उत्पादनात मोठी घट आणि अनिश्चितता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या 21 जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत एकूण 454 गावांमध्ये अंमलबजावणी केली जात असून, हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून, शुक्रवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत 'लागवडपूर्व तंत्र, हमखास यशाचा मंत्र' या विषयावर एका विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये कोणते बदल करावेत, नैसर्गिक आपत्तींमधील जोखीम कशी कमी करावी आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, योग्य पेरणी पद्धती, बियाण्यांची निवड आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापराबाबतही सविस्तर माहिती दिली जाईल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, भगिनी, कृषिताई, महिला शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांना या वेबिनारचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी गटामध्ये एकत्र बसून प्रकल्पाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर किंवा https://www.youtube.com/@PoCRAMaharashtra या लिंकवर हा वेबिनार नक्की पहावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments