Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी पाच दिवस वाहतुकीत बदल

 


अमरावती, दि. ८ (Gramin Uday News Netwark): हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे की, अमरावती जिल्ह्यातील महामार्गाच्या पट्ट्यात 9 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या पाच दिवसांच्या कालावधीत वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम एकूण 10 टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी. 90+500 ते  कि.मी. 150+300 या दरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या तांत्रिक कामामुळे प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेनुसार करावे आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments