बरेली, १० डिसेंबर:
जर तुम्हाला लग्नानंतर कुटुंबासोबत राहायचे नसेल, तर लग्नाच्या बायोडाटामध्ये स्पष्टपणे लिहा की असा पती हवा आहे ज्याचे कोणीही नसेल, अशी आक्रमक टिप्पणी करत बरेलीतील कौटुंबिक न्यायालयाने एका शिक्षिकेची कानउघाडणी केली आहे. एका व्यावसायिकाने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मंजूर करताना न्यायालयाने कौटुंबिक मूल्यांना तडा जाणाऱ्या प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली.
संयुक्त कुटुंबाबाबत भूमिका: कौटुंबिक न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश ज्ञानेंद्र त्रिपाठी यांनी म्हटले की, ज्या मुलींना लग्नानंतर फक्त पतीसोबत राहायचे आहे, त्यांनी बायोडाटामध्ये स्पष्टपणे नमूद करावे की त्यांना असा जोडीदार हवा आहे, ज्याच्या घरी आई-वडील किंवा भावंडे नसतील. संयुक्त कुटुंबाला ओझे समजणे ही सामाजिक रचनेसाठी समस्या निर्माण करणारी प्रवृत्ती आहे, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.
शिक्षिकेचे वर्तन: संबंधित विवाहिता एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. संभाषणातून हे स्पष्ट झाले की, विवाहितेला संयुक्त कुटुंबाचा तीव्र तिरस्कार होता. पतीने न्यायालयात सादर केलेल्या छायाचित्रांमध्ये, पत्नीने मंगळसूत्र, सिंदूर, जोडवी यांसारखी कोणतीही सौभाग्यचिन्हे परिधान केलेली नव्हती. लग्नाच्या एका वर्षानंतर तिने वैवाहिक संबंधही नाकारले होते.
वडिलांवरही ताशेरे: न्यायाधीशांनी निर्णयात लिहिले की, विवाहितेच्या वडिलांनी मुलीला समजावण्याऐवजी वेगळे राहण्याची अट लादली. हा दबाव निंदनीय आणि वैवाहिक संस्थेच्या विरोधात वर्तन आहे.
चिंताजनक प्रश्न:
न्यायाधीशांनी महाभारताचे उदाहरण देत म्हटले की, जी व्यक्ती स्वतःच्या कुटुंबातील मूल्यांचा आदर करू शकत नाही, ती विद्यार्थ्यांना संस्कार कसे देईल? हा एक चिंताजनक प्रश्न आहे. कौटुंबिक मूल्यांना कमकुवत करणाऱ्या अशा प्रकरणांमध्ये विधिमंडळानेही लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन न्यायालयाने केले आहे.
Post a Comment
0 Comments