दि.२४ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क, यवतमाळ
यवतमाळ: खुल्या बाजारात सरकीच्या दरात वाढ झाली आहे आणि रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. यामुळे खुल्या बाजारात ७,२०० रुपये क्विंटल असलेला कापसाचा दर ७,६०० ते ७,७०० रुपये क्विंटलपर्यंत वर चढला आहे. यामुळे कापड उद्योगाकडून कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाकडे आयात शुल्क वाढू नये म्हणून पाठपुरावा करण्यात येत आहे.
बाजाराची सद्यस्थिती
- सरकीचे दर: बाजारात सरकीचे दर ३,१०० रुपये क्विंटल होते, ते आता ३,५५० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत.
- डॉलर/रुपया विनिमय: डॉलरच्या किमती वाढल्याने रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. ८७ रुपयांचा डॉलर आता ९१ रुपयांवर पोहोचला आहे.
- कापसाच्या गाठीचे भाव: यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाची गाठ ४९,००० रुपयांवरून ५२,००० रुपयांवर पोहोचली आहे.
आयात शुल्क आणि उद्योजकांची मागणी
देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत, तर जागतिक बाजारात कापसाची गाठ ५० हजार रुपयांच्या आत आहे. यामुळे कापूस आयात करण्यावर उद्योजकांचा भर आहे. कमी दरातील कापूस आयात करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे.
- खुल्या बाजारात स्वस्त कापूस मिळावा, म्हणून आयात शुल्क निरंक ठेवण्याची गरज उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
- ३१ डिसेंबरनंतर कापसावरील आयात शुल्क पुन्हा जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाला बगल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे, यामुळे कापूस उत्पादकांत धास्तीचे वातावरण आहे.
अमेरिकेशी कराराच्या वाटाघाटीने परिणाम
अमेरिकेशी व्यापारातील वाटाघाटी सुरू आहेत. देशात ब्राझील आणि अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात कापूस येत आहे. आयात शुल्क वाढल्यास कापूस गाठी महागणार आहे. यामुळे व्यावसायिकांनी आयात कापसावरील शुल्क निरंक ठेवण्यासाठी दबाव वाढविला जात आहे.
कृषी अभ्यासकाचे मत
विजय जावंधिया, कृषी अभ्यासक यांच्या मते, केंद्र शासन ब्रिटिश विरोधी धोरण राबविणार नाही, असे सांगत आहे. प्रत्यक्षात ब्रिटिशकाळात व्यापारवाद होता. आताही व्यापारवादाला खतपाणी दिले जात आहे. कच्चा माल स्वस्त आणि पक्का माल महाग हे धोरण राबविले जात आहे. यातून कापूस उत्पादक नाडला जात आहे.
पुढील काळात हा कल शेतकऱ्यांसाठी संकटाचे कारण ठरणार आहे, त्यासाठी सरकारने कापसावर आयात शुल्क वाढविण्याची मागणी आहे.
Post a Comment
0 Comments