दि.३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-
कंचन मुरके,अमरावती
"जुने जाऊ द्या मरणाला गुणी झाडूने अथवा पुरून टाका पडल्या हाका" अशा जरी काव्य ओळी लिहिल्या असल्या तरी नूतन वर्षाचे नवे संकल्प करावे,झाले गेले लक्षात घेऊन पुढे चालावे...! असं आज नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतांना म्हणावसं वाटतं.कारण नवीन वर्ष म्हणजे सगळेच नवीन नसून गेल्या वर्षात काय घडल किंवा मग आम्ही काय केल हे लक्षात घेणे होय, मग ते तुमचा आरोग्य असो कोणते राहिलेले कार्य असो किंवा नातेसंबंध अथवा कुणाला दिलेले आश्वासन असो ते विसरता कामा नये.
वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असा विचार सुरू होतो. काहींच्या मनात सुरू असलेले विचार 'थर्टी फर्स्ट'च्या रात्रीच रंगबिरंगी मद्याच्या तर सिगारेटच्या धुरात विरतात. परंतु, काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प एक- दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष पाळले जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही.
नूतन वर्ष सुरू होण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक राहिलेत. स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे सुरू होणार्या नवीन वर्षाच्या सुरवात होण्यापूर्वीच काही विचार करायला हवेत.
धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो, की त्याचा आपल्याला तर मन:स्ताप तर होतोच. परंतु, त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो. परंतु, त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे. नवे काही घडत असले की जीवनाला अधिक स्फूर्ती मिळते जोश उत्साह निर्माण करते म्हणूनच तर नवे वर्ष पंचांग पुरते मर्यादित नसून जेवणाला नारायण दत्त देणारे असते हे निश्चित चला तर मग नवीन वर्षाच्या शुभेच्छां सर्वांना लेखणीतून शुभेच्छा...!
Post a Comment
0 Comments