· माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचे आवाहन
· चिखलदऱ्यात आदिवासी मुलींशी साधला भावनिक संवाद
चिखलदरा (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : मेळघाटातील आदिवासी मुलींना शिक्षित करण्यासाठी पद्मश्री डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ यांनी १९८० च्या काळात पुढाकार घेतला. आज एवढ्या वर्षात हजारो मुली शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. आज तुम्ही मुलींनी खूप खूप शिक्षण घेऊन सिंधुताईंचे स्वप्न पुर्ण केले पाहिजे, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश श्री. भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई गवई यांनी केले.
वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ शहापूर (चिखलदरा) द्वारा संचलित सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चिखलदरा येथे मुलींना मार्गदर्शन करतांना मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. आदिवासी मुलींशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले. आत्मविश्वास, शिक्षण आणि जिद्दीचे महत्व त्यांच्या अनुभवातून सांगितले.“परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे,” “स्वप्ने लहान नसतात, ती पूर्ण करण्याची ताकद आपल्यातच असते. परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्न कधीच थांबवू नका,” असा प्रेरणादायी, आश्वासक व मायेचा संदेश त्यांनी दिला. "मुलींनो तुम्ही शिकलात तर आपल्या मेळघाटला लागलेला कुपोषणाचा कलंक दूर होण्यासाठी तुमचे शिक्षण उपयोगी पडेल, तसेच आदिवासिंचा स्तर उंचावण्यास मैलाचा दगड ठरेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माईंच्या अथक परिश्रमातून स्थापन झालेल्या सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात आचार्य डॉ. कमलताई गवई यांच्या रूपाने एक हृदयस्पर्शी क्षण अवतरला, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी व्यक्त केली.
संस्थेचे सचिव अरूणभाऊ सपकाळ यांनी माजी राज्यपाल स्व. दादासाहेब गवई यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कमलताई यांनी संस्थेला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. संस्थेत कमलताईचे आगमन होताच निरागस चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहू लागला. लहान मुलींनी फुलांच्या गंधासह आपली निरागसता अर्पण करत पुष्पगुच्छ देऊन मातेसमान स्वागत केले. कमलताईंनीही त्यांना प्रेमळ स्पर्श देत आईची ऊब अनुभवायला लावली. त्यानंतर त्यांनी समाजमाता पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला नम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, सचिव अरूणभाऊ सपकाळ, अधिक्षिका सरीता सपकाळ, प्रसाद सपकाळ, जान्हवी सपकाळ, गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी यांच्यासह संस्थेतील मुली, कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.
Post a Comment
0 Comments