पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली
दि.१२ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज, १२ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. लातूर येथील त्यांच्या 'देवघर' निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक अशा सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांच्या दीर्घ सार्वजनिक कारकिर्दीला उजाळा दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे (X) आपली श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, "माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या निधनाने दुःख झाले आहे. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत पाटील यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, तसेच महाराष्ट्र विधानसभेचे आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले".
मोदींनी पुढे असेही नमूद केले की, "त्यांना समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची खूप आवड होती. काही महिन्यांपूर्वीच माझी त्यांच्याशी भेट झाली होती, तेव्हा त्यांच्याशी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली". या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे म्हणत त्यांनी ओम शांती असे म्हटले आहे.
राजकीय योगदान:
शिवराज पाटील यांनी १९९१ ते १९९६ दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष (Speaker) म्हणून कार्यभार सांभाळला.
UPA सरकारच्या काळात (२००४ ते २००८) त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
त्यांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणूनही काम केले आहे.
पाटील यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक संयमी, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments